ग्रामीण
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात;50-50 ची कोंडी

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारातच;
50-50 च्या कोंडीत अडकला गामपंचायत कर्मचारी
सुनील शिरपुरे/झरीजामणी
ग्रामीण स्तरावरील विकासात्मक यंत्रणा म्हणजे ग्रामपंचायत. या ग्रामपंचायतचा मुख्य पाया हा ग्राममपंचायत कर्मचारी असतो. ग्राम पातळीवरील विकास कामात मदत करणारा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. हा कर्मचारी बिचारा तुटपुंज्या वेतनावर रात्रंदिवस राबत असतो. तरीपण यांची अवस्था अत्यंत दयनियच. यांचा शासन दरबारीही विचार केल्या जात नाही आणि ग्रामस्तरावर पण..यातील ब-याचशा कर्मचा-यांची आर्थिक परिस्थिती ही खूप हलाखीची असून तुटपुंज्या वेतनावर आपल्या जीवनाचा गाडा हाकत आहेत. याच वेतनावर संसार, मुलांचे शिक्षण, विवाह, सुख-दु:ख व इतर अनेक समस्यांना तोंड देत आपले कर्तव्य बजावत आहेत. या सणासुदीच्या काळात दिवाबत्ती, पाणीपुरवठा यासारखी महत्त्वाची ग्राम पातळीवरील कामे बजावणारा ग्रामपंचायत कर्मचारी आपल्या कुटूंबासमवेत दिवाळीसारखा महत्वाचा सण अंधारात साजरी करतांना दिसून येत आहे. त्यांना मिळणा-या तुटपुंज्या वेतनातही हे कर्मचारी 50-50 च्या कोंडीत अडकलेले आहेत. असं असलं तरी ते वेळेवर न मिळणे ही किती लाजीरवाणी गोष्ट आहे. या गोष्टीची शासन दरबारी दखल घेणे खूप गरजेचं आहे. यांना आपली सेवा बजावतांना लोकांची बोलणी तर खावीच लागते. शिवाय काही दिडशहाणे सरपंच व सचिवांची पण.. निदान सरपंच व सचिव लोकांनी तरी यांचा विचार करायला पाहिजे. परंतु तेही करतांना दिसत नाही. कुठे-कुठे सरपंच व सचिव यांच्यात खटके उडालेले असतात. अशावेळी ऐकायचं कुणाचं या पेचात हे कर्मचारी अडकलेले असतात. कारण सरपंच एक म्हणतो तर सचिव एक..यात सरपंचाच ऐकलं तर सचिवांना राग व सचिवाचं ऐकलं तर सरपंचाना राग..या गोष्टी वरिष्ठ अधिका-यांना ज्ञात असूनही तेही याच कर्मचा-यांना दोषी ठरवतांना ब-याच ठिकाणी दिसून येते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कर्मचा-यांचे राहणीमान भत्ता व भविष्यनिर्वाह निधी ब-याच वर्षापासून थकीत आहे. ती थकीत रकमेची आकडेवारी बघता ती देय रक्कम अदा करण्यासाठी कुठे सरपंचाचं तर कुठे सचिवाचं पोट दु:खायला लागत असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसून येते. ही थकीत रक्कम अदा करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून पत्रव्यवहार होतो. परंतु अद्यापही ग्रामपंचायतमार्फत ते अदा करण्यात आले नाही. 50-50 च्या कोंडीतील ग्रामपंचायतकडून मिळणारे 50% वेतन काही कर्मचा-यांना मिळाले तर काही कर्मचा-यांना वैयक्तिक हेवेदाव्यातून ती मिळालीच नाही. शासनाकडून मिळणारे 50% वेतन आज मिळेल, उद्या मिळेल अशी आशा असतांना आज दिवाळीचा दिवस उजाळला तरी ती मिळाली नाही. अशी जीवनगाथा असणा-या या कर्मचा-यांना शेवटी आपली दिवाळी अंधारातच घालवावी लागत आहे. याची खंत वाटणे साहजिकच आहे. याच कर्मचा-यांनाप्रमाणे वरिष्ठ अधिकारी व आपले मंत्री-संत्री यांचीसुध्दा दिवाळी खरच अंधारात जात आहे का यावर विचारा करावा लागणे ही सर्वात मोठी शोकांतिका आहे.