ग्रामीण

समाजाला दिशा देणारा हेरवाड ग्रामपंचायतीचा निर्णय.. -प्रा .डॉ. सुधीर अग्रवाल यांचा लेख

महाराष्ट्रातील सुधारणावादी संस्कृतीला साजेसा तेवढाच ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने घेतला आहे.
सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील हेरवाड या गावाबद्दल सगळीकडे चर्चा सुरू आहे. त्याचं कारण हेरवाड ग्रामपंचायतीने घेतलेला एक निर्णय…

पतीच्या निधनानंतर विधवा महिलेला दिली जाणारी वागणूक म्हणजे विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय हेरवाड ग्रामपंचायतीने घेत समाजाला नवं दिशा देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे.

फुले, शाहू, आंबेडकरांचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात विधवा महिलांना समाजात इतर स्त्रियांप्रमाणे मानसन्मान मिळावा यासाठी हेरवाड गावाने उचलेलं हे पाऊल कौतुकास पात्र आहे.

पतीच्या निधनानंतर महिलांना दिली जाणारी वागणूक म्हणजे विधवा प्रथा आजही सूरू आहे. या प्रथेनुसार पतीच्या निधनानंतर स्त्रीच्या गळ्यातील मंगळसूत्र काढलं जातं, कपाळावरचं कुंकू पुसलं जातं, पायातील जोडवी, हातातील बांगड्या तसंच अंगावरील दागिने काढले जातात.पतीच्या निधनानंतर महिलेचं आयुष्य एकाकी करण्याच्या या प्रथेमुळे विधवा महिलांना धार्मिक, सामाजिक कार्यात सहभागी होता येत नाही. कोणत्याही शुभ कार्यात विधवा महिलांना हीन वागणूक दिली जाते. याच प्रथेच्या विरोधात हेरवाड ग्रामस्थांनी आवाज उठवला. हेरवाड गावातील लोकांनी हा समज झुगारून लावत ग्रामसभेत या प्रथेविरोधात ठराव संमत केला.हेरवाड ग्रामपंचायतीने विधवांना सन्मानाने जगता यावं यासाठी एक स्तुत्य निर्णय घेतला आहे.

हेरवाड गावचे सरपंच सुरगोंडा पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला. ग्रामसभेत हा विधवा प्रथा बंद करण्याबाबत ठराव मांडला आणि इतर ग्रामपंचायत सदस्यांनी या ठरावाला एकमताने मंजूरी दिली.करमाळा इथल्या महात्मा फुले सामाजिक संस्थेचे प्रमुख प्रमोद झिंजाडे यांच्या प्रेरणेतून हा निर्णय घेतल्याचं सरपंच सुरगोंडा पाटील यांनी सांगितलं.
प्रमोद झिंजाडे हे राज्य विधवा महिला सन्मान व संरक्षण कायदा अभियानाचे समन्वयक आहेत.

“विधवा महिलांनाही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. त्यांना त्यांचे हक्क मिळावेत यासाठी अशा प्रथा बंद करण्याची गरज आहे. शिरोळ तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींनी अशा प्रकारचे ठराव संमत करून सरकारकडे पाठवावेत,” असंही सरपंच पाटील यांनी म्हटलं.

ग्रामपंचायतीच्या ठरावाच्या माध्यमातून हा प्रश्न विधानसभेत मांडला जावा यासाठी हेरवाड ग्रामपंचायतीने हे छोटं पाउल उचलल्याचं पाटील सांगतात. विधानसभेत विधवा प्रथा बंद करण्याचा कायदा संमत व्हावा यासाठी इतर गावांमधूनही पाठिंबा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
अपमानास्पद वागणूक सोसणाऱ्या विधवा महिलांना सन्मान देण्यासाठी हेरवाड ग्रामपंचायतीकडून प्रयत्न केले जाणार आहेत.

विधवा महिलांना धार्मिक, सामाजिक कार्यक्रमात सहभागी होता यावं, इतरांप्रमाणे सामान्य आणि सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी हेरवाड ग्रामसभेतील हा निर्णय महत्त्वाचं पाऊल आहे, असं हेरवाडच्या रहिवासी राणी माने यांनी म्हटलं.

हेरवाडच्या या क्रांतिकारी निर्णयाची दखल समाजाच्या सर्वच स्तरातून घेतली गेली. समाज माध्यामातून हेरवाड गावाच्या या निर्णयाचं स्वागत होत आहे. विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेणारी हेरवाड ग्रामपंचायत ही पहिलीच ग्रामपंचायत आहे.

९५६१५९४३०६

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button